Saturday, 12 July 2014

जीवनात व संस्कारात बदल घडणे आवश्यक आहे.


काही लोक नित्यनियम देव पूजा करतात व मंदिरात जातात, काही लोक आठवडयातून तीन ते चार वेळा देव पूजा करतात व मंदिरात जातात तर, काही लोक देवाचे नामस्मरण दिवसभरातून एखाद्वेळा तरी करतात. पण हे सर्व करत असतांना सुद्धा आमच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी, मानसीक अस्वस्थता, दुखं कमी न होता दिवसंदिवस वाढतच आहे. तर याचं कारण काय असावं...?. मंदिरात गेल्यावर जितका वेळ आम्ही मंदिरात असतो तेवढाच वेळ आम्हाला प्रसन्न वाटतं व मंदिरातून बाहेर आल्यावर जैसे थे होतं. तसेच देवपूजा किंवा देवाचे स्मरण जितका वेळ आम्ही करत असतो तेवढाच वेळ आम्हाला प्रसन्न वाटतं आणि देवाचे नामस्मरण थांबवले, देवपूजा थांबवली कि, पुन्हा दैनंदिन अवस्था जैसे थे होते. तर याचं कारण काय असावं...?.

तर याचं कारण असं आहे कि, आम्ही नित्यनियम देवपूजा करतो, मंदिरात जातो व देवाचे नामस्मरण करतो पण आमच्या जीवनात व संस्कारात ते विचार उतरवत नाही. म्हणून आमची दैनंदिन परिस्थिती सुधारण्यापेक्षा दिवसंदिवस ढासळत आहे. आम्ही मंदिरात असतो किंवा देव पूजा करत असतो तितकाच वेळ स्वतःच्या अवगुणांना दूर ठेवत असतो आणि मंदिरातून बाहेर पडलो किंवा देव पूजा संपवली कि, पुन्हा एक-दुसऱ्याची निंदा करणे, एक-दुसऱ्याबद्दल अपशब्द व वाईट बोलणे, एक-दुसऱ्यावर जळणे ह्या सर्व निरर्थक गोष्टी आमच्या पूर्वरत चालूच असतात. म्हणून आमची दैनंदिन परिस्थिती सुधारण्यापेक्षा दिवसंदिवस ढासळत आहे.

प्रसन्न वाटतं म्हणून मंदिरात जाणे, देवपूजा व देवाचे नामस्मरण करणे याला काही एक अर्थ नाही. तर आपल्या जीवनात व संस्कारात बदल घडणे आवश्यक आहे. आमच्या जीवनात व संस्कारात ज्यादिवशी बदल होईल त्यादिवसापासून आमची दैनंदिन परिस्थिती सुधारेल, आमच्या जीवनातील दुखं व अडचणी दुरावतील. नाहीतर २४ तास जरी देव पूजा केली व मंदिरात बसून राहिलो तरी काही एक अर्थ नाही. 

.. मनोज गुजर 

No comments:

Post a Comment